भाजपा महायुती जनतेने स्वीकारली ; राज्याच्या हितासाठी महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा
आ.पंकजाताई मुंडे

किल्ले धारूर ( प्रतिनिधी)
राज्यात सत्तेवर असलेली भाजपा महायुती जनतेने स्वीकारली आहे, कारण त्यांनी लोकांसाठी योजना दिल्या, डोळ्याला दिसणारे काम केले. राज्याचा विकास असाच पुढे सुरू ठेवायचा असेल तर महायुतीला पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, त्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांनी धारूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.
माजलगांव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यासाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी आज धारूर येथे जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.स्वरूपसिंह हजारी, जयसिंह सोळंके, महायुतीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. पंकजाताई म्हणाल्या, मला कधीच वाटलं नाही, मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल. पण आम्ही आता युती स्वीकारली आहे. लोकांनी देखील ती स्वीकारली कारण त्यांनी लोकांना योजना दिल्या. मी इथ महायुतीचा धर्म म्हणून आले आहे. अजित पवार यांनी जाहीर केले की आमचे सरकार पुन्हा आले तर २१०० रुपये लाडक्या बहिणीला देणार आहेत. महायुती सरकारने आपल्या सत्ताकाळात विविध विकास योजना राबवून महिला, युवा आणि जेष्ठांचे सबलीकरण उद्दिष्ट साध्य केले. हाच अजेंडा पुढील पाच वर्षात सुरू ठेवण्यासाठी विरोधकांच्या कोणत्याही भुलथापास बळी न पडता माजलगावच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला प्रकाशदादा सोळंके यांना बहुमताने विधिमंडळात पाठवा. मी पालकमंत्री असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही अस सांगतानाच लोकसभेत कटकारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली.पंकजा मुंडे चा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, ओठात एक पोटात एक असे मी वागत नाही असं आ. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.