काय म्हणाले नूतन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पहा.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीस अधीक्षकांपुढे आव्हान.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे, घडलेल्या घटनांचा कायद्याच्या कसोटीवर तपासाव्या लागणार आहेत. यामध्ये कोणालाही सोडले जाणार नाही. जिल्ह्यामध्ये झालेली परिस्थिती बदलण्यात आपण यशस्वी ठरू, असा विश्वास व्यक्त करीत, बीडकरांनो विश्वास ठेवा नक्की बदल घडवून आणणार, अशी ग्वाही कालच रुजू झालेले बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी दिली.बीड जिल्ह्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी आज पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील विविध प्रश्नावर आपली काय भूमिका असणार आहे याची मांडणी केली. यावेळी कॉवंत म्हणाले की, शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ही टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत बोलताना ते म्हणाले की, फरार असलेले सगळे आरोपी लवकरात लवकर पकडले जातील. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे आणि याबाबत पोलिसांनी काय काय केले आहे याचा आढावा आपण आता लगेच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी आणि एकूणच सगळे प्रश्न आपण समजून घेत असून, लवकरच याच्यावर पूर्णपणे कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले. प्रश्न समजून घ्यायला वेळ लागेल मात्र मुळासकट सगळे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला राजकीय पाठबळ असल्याचे विचारल्यानंतर पाठबळ कोणाचेही असले तरी आपण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करू असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जनतेसाठी पोलीस सदैव तत्पर असणार असून कधीही कोणत्याही ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता अशी व्यवस्था मी करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी जनतेची ही मला सहकार्य लागणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, जिल्ह्यातील सुव्यवस्थेत बदल घडवून आणणारच अशी ग्वाही त्यांनी बीडकारांना दिली आहे.