दगडी पुलावरून शालेय विद्यार्थी वाहून जाताना नागरिकांनी वाचवले,व्हिडिओ पहा.
जीव धोक्यात घालून नागरिक या पुलावरून करतात प्रवास.

बीड :जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून बिंदुसरा नदी भरून वाहत आहे. बीड शहरातील चांदणी चौक येथील दगडी पुलावरून नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.
मात्र, दुपारी एका शालेय विद्यार्थ्याने सायकल घेऊन या पुलावरून जात असताना तो अचानक पाण्याच्या प्रवाहात अडकला. त्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर वाचवण्यात आले. ही धोकादायक घटना घडली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या पुलावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने नागरिक धोका पत्करून पुलावरून प्रवास करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पुलाच्या दोन्ही टोकांवर गस्त घालून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वच तलाव ओव्हरफ्लो होत असून, पाली येथील बिंदुसरा तलावही पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्र धोकादायक पातळीवरून वाहत आहे. यामुळे बीड शहरातील निचांकी भागात पाणी साचले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पुलावरून पाणी जात असताना देखील नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून ये जा करत असताना दिसत आहेत त्यामुळे हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा. मुलाला वाहून जाताना नागरिकांच्या सतर्कतेने मुलाचे प्राण वाचले.