बीड जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी- अनिलदादा जगताप
बीडकरांसाठी अनिलदादांची हाक;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नुकसानीचा अहवाल सादर!

बीड, प्रतिनिधी – मुसळधार पावसाने बीड जिल्हा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. दि. 14 ते 23 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले असून त्याची आकडेवारी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासमोर मांडली असून पूरपरिस्थितीने बीड जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी, पीडित नागरिक आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा मिळावा, यासाठी बीड जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
मुसळधार पावसाच्या तडाख्याने सर्वात मोठा फटका शेतीला बसला असून तब्बल 78 हजार 450 हेक्टर जिरायत शेती पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या जमिनीवर पूर्णतः पाणी फिरल्याने हतबलता वाढली आहे. तसेच जिल्ह्यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात आष्टी तालुक्यात 5, परळी आणि धारूर तालुक्यात प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. सुदैवाने जखमींची कोणतीही नोंद नाही. याशिवाय, 131 जनावरे दगावली तर घरांच्या नुकसानीत 18 पक्की घरे, 159 कच्ची घरे, 5 झोपड्या आणि जनावरांचे 10 गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानाचा संपूर्ण अहवाल लक्षात घेऊन लागलीच आपण बीडकरांच्या पुनर्वसनासाठी ठोस पाऊले उचलणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले आहे.