देशमुख हत्या प्रकरणात आमचा सहभाग नाही…कराडच्या वकिलाचा दावा.
कराड पाठोपाठ विष्णू चाटेनेही केला न्यायालयात अर्ज दाखल.

मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्प खंडणी व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने दोषारोपत्रातून नाव वगळावे असा अर्ज न्यायालय सादर केला होता. सुनावणीत या हत्याकांडातील मुख्य आरोपी असणाऱ्या वाल्मीक कराडच्या वकिलाने वाल्मीक कराडचा या प्रकरणात प्रत्यक्षात कुठेही सहभाग दिसून येत नसल्याचा दावा केला. त्यानंतर कोर्टाने या बहुचर्चित खटल्याची सुनावणी 7 मे पर्यंत तहकूब केली. पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः उपस्थित राहणार आहेत.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निघृण हत्या झाली होती. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराडसह अन्य काही आरोपींवर बीड कोर्टात खटला सुरू आहे. या खटल्याची आज सुनावणी झाली. त्यात वाल्मीक कराड व विष्णू चाटे या दोघांनी दाखल केलेल्या डिस्चार्ज अर्जावर सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली. या प्रकरणी मूळ फिर्यादीचा जबाब मागवण्यात आला आहे.
प्रकरणात कुठेही सहभाग दिसून येत नाही असा युक्तिवाद आम्ही कोर्टात केला. त्यावर दोषारोपपत्रातील पुराव्यांच्या आधारावर सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली. त्यात काय पुरावे गोळा केले व काय म्हणणे सादर केले हे युक्तिवादातून समोर येईल.
दरम्यान, आजच्या सुनावणीत विष्णू चाटेला बीड कारागृहात हलवण्याच्या मागणीवर आज सुनावणी झाली. त्यावर कारागृह अधीक्षक व सरकारी पक्षाने आपले म्हणणे कोर्टापुढे सादर केले. या प्रकरणी आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
न्यायालयात गुरुवारच्या सुनावणी दरम्यान धनंजय देशमुख, सीआयडीच्या अपर अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक अनिल गुजर उपस्थित होते. अॅड. उज्ज्वल निकम अनुपस्थित होते. तर, वाल्मीक कराडचा मुलगा,चाटेचे कुटुंबीयही उपस्थित होते. दरम्यान, धनंजय देशमुख हे कारागृह प्रशासनाला २ अर्ज देणार असल्याचे त्यांनी सांगितले.या अर्जावरील सुनावणी ७ मे रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली.