बिंदुसरा धरणावर युवकांची जीवघेणी हूल्लडबाजी पहा.
पाण्यात उतरून फोटो,सेल्फी व स्टंटबाजी ठरू शकते जीवघेणी.

बीड ( दि.०३ ) बीड शहराजवळील पाली येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प प्रथमच मे महिन्याच्या शेवटी १०० टक्के पुर्णतःभरलेले असुन धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागले आहे या दृश्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने धरण परिसरात गर्दी करत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक असुन नागरीकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करून सुद्धा पर्यटकांना याचे गांभीर्य नसुन त्याकडे दुर्लक्ष करत धरणाच्या भिंतीवर, सांडव्यावर, पायथ्याशी पर्यटक जमा होत असून कठड्यावर उभे राहून फोटो शेषन व सेल्फी काढत आहेत. पर्यटकांच्या हुल्लडबाजी व हलगर्जीपणामुळे अपघात घडुन जिवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावेत तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास संबधित विभागाच्या जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी , आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ बीड, उपविभागीय अधिकारी बीड,तहसीलदार बीड, पोलिस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन यांना केली आहे.
पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असुन अचानक पाण्याची पातळी वाढू शकते.त्यामुळे धरण परिसरात जाणे टाळावे, धरणाच्या काठावर उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेणे अत्यंत धोकादायक असुन अपघाताची शक्यता असल्याने टाळावे तसेच पालकांनी मुलांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. मात्र याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसुन येत आहे.
२०२१ मध्ये बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात बुडून २ युवकांचा दुर्दैवी मृत्यू.
बिंदुसरा धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला “सावधान प्रतिबंधक क्षेत्र “असा फलक लावण्यात आला असून अपघात,दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही,कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ बीड आदेशावरून असा फलक लावण्यात आला असून या तलावाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संरक्षण व्यवस्था नसल्यामुळेच त्याठीकाणी अपघाताच्या घटना घडत असुन पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकतात मात्र प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक नेमकं काय काम करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत.भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार आधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.