वाल्मीक कराडच्या जीवाला धोका?नाशिक कारागृहात हलवणार.
'अंदर मारना या मरना सबकुछ माफ है'बबन गित्तेची पोस्ट.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नाशिक येथील कारागृहात हलवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
बीड कारागृहात त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, बीड कारागृहात गीत्ते गँग व कराड गँग यांच्यात मागील काळात वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गँगवॉर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अक्षय आठवले टोळीबरोबर कराडचा वाद उफाळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्याची रवानगी नाशिकला केली जात असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे इतर आरोपी सध्या बीड कारागृहात आहेत. तथापि, कराडच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे फक्त त्याची रवानगी नाशिकला केली जात आहे. काही महिन्यापूर्वी वाल्मीक कराड याच्यावर गीते व आठवले गॅंग ने कारागृहात हल्ला केला होता. यानंतर वाल्मीक कराडवर झालेल्या हल्ल्यानंतर शशिकांत ऊर्फ बबन गीत्ते याच्या पोस्टमधून वाल्मीक कराड याला इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असे म्हटले आहे. बबन गित्ते याच्या या पोस्टनंतर बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.